उगाच पाण्याला जीवन म्हणत नाही...!
गेला तो हिवाळा आणि आला आता उन्हाळा
म्हणजे पुन्हा सुरू होणार ती पाणी टंचाई,
पाणी होतं तो पर्यंत काही वाटलं नाही
पण या भर उन्हाळ्यात मात्र आता जपून पाणी वापरावं लागेल बाई.
म्हणतात ते खोटे नाही, की
वस्तूची किंमत ती दूर गेल्याशिवाय कळत नाही,
आणि आता या कडक उन्हाळ्यात ही
लोकांना पाण्याचं महत्त्व समजल्याशिवाय राहणार नाही.
प्रत्येकाने वापरावे जपून पाणी
ही आपली आहे एक जबाबदारी,
टाळावी नासाडी पाण्याची
घ्यावी सर्वांनी ही खबरदारी.
अन्नाशिवाय जगू शकतो मनुष्य काही दिवस
परंतु, पाण्याशिवाय जगणं कठीण आहे मनुष्याला,
म्हणून जाणा महत्त्व पाण्याचे
कारण पाण्याशिवाय अर्थ नाही या आयुष्याला.
जेवढे महत्त्व पाण्याचे मनुष्याला नाही
तेवढे हे पाणी महत्त्वाचे पशू-पक्ष्यांसाठी आहे,
कित्येक पशू-पक्षी पाण्याविना जीवाला मुकतात
याची जाणीव तरी कोणाला आहे?
धरणीच्या पोटात ही आता कोरड पडू लागली
आणि भर उन्हाळ्यात जाणवू लागला पाण्याचा तुटवडा,
आता पुन्हा टॅंकर भोवती जमा होणार गर्दी, नाहीतर
बायका निघणार पायी शोधवयास एखादी नदी किंवा ओढा.
असंख्य शोध लावलेत वैज्ञानिकांनी
परंतु, अजून पाणी तयार करता आले नाही,
म्हणूनच पाणी हे अमृत समान आहे
उगाच पाण्याला जीवन म्हणत नाही...!
-अंकिता घुगे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें