संदेश

नवंबर, 2021 की पोस्ट दिखाई जा रही हैं

मन काय असतं?

 मन काय असतं? एक भावना, एक समज, की, देवाने दिलेला एक मित्र? हे तर नक्की माहित नाही, पण हो.. आपल्या जगण्यात त्याचं महत्त्वाचं असतं पात्र. दिसत तर कुणालाच नसतं, तरीही त्याचं ऐकावं लागतं, त्याच्या एका इशाऱ्यावर ते संपूर्ण शरीराला कामाला लावतं. कुणी म्हणतं "आम्ही मनाचे राजे", तर कुणी म्हणतं "आम्ही मनाचे गुलाम", आपण कितीही प्रयत्न केला थांबवण्याचा तरी नाही लागत त्याच्या फिरण्यावर लगाम. नेहमी सैरभैर भटकत असतं, विचारांचे पाढे मांडत असतं, अदृश्य असूनही ते शरीरावर नेहमीच आपली हुकूमत गाजवत असतं. पण जी गोष्ट मनाने करायची ठरवली तर अशक्य ही शक्य होऊन जातं, त्यासाठी मनाला आपला मित्र बनवावं लागतं जितकी त्याची मैत्री चांगली तितकंच शत्रुत्व महाग पडतं. आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर मनाचे राजे व्हा, चुकून गुलाम बनलात तर पडेल तुम्हालाच महाग. असो..., मन काय असतं? हे तर नक्की मला माहित नाही, पण हो... देवाने दिलेली ती एक भेट आहे जे सुचवते प्रत्येकाला काही न काही.                                 -अंकिता घुगे.   ...

सुख नेमकं कशात असतं?

 कुणाचं कशात तर कुणाचं कशात असतं, हे सुख नेमकं कशात असतं. "मला इतकंच का मिळालं" हे सुख असतं? की, "मला इतकं मिळालं!" हे सुख असतं? कुणाचं दुसऱ्यांच्या सुखातच सुख असतं, तर कुणी स्वतःला खुश ठेवण्यातच खरं सुख मानतं. कुणाचं सुख पैशाने विकत मिळतं, तर कुणाचं प्रेमाच्या दोन शब्दांतच आयुष्यभराच सुख असतं. कुणी दुसऱ्याने आपल्यावर केलेल्या प्रेमात सुख शोधतं, तर कुणाला स्वतःवर प्रेम करून सुख मिळतं. कुणाला दुसऱ्यांसाठी जगून खरं सुख अनुभवता येतं, तर कुणी "स्वतःसाठी जगणं हेच खरं सुख" असं म्हणतं. या सगळ्या गोष्टींवरून एक मात्र नक्की कळतं, कुणाचं सुख कशात तर कुणाचं कशात, हे ज्याच्या त्याच्या विचारांवर निर्भर असतं. तरीही सुखाची व्याख्या जर शोधली, तर एकचं उत्तर मिळतं, की, खरं सुख हे फक्त समाधानी असण्यातच असतं.                               -अंकिता घुगे.

अनुभव-एक शस्त्र

 जन्माला आल्या आल्या कोणी हुशार होत नाही, आईच्या पोटातूनच कोणी आयुष्याचे धडे शिकून येत नाही. आपण जसे मोठे होत जातो तसं सगळंच हळूहळू कळायला लागतं, वाढत जातात अपेक्षा ही आणि हळूहळू छोटंसं जग मोठं वाटायला लागतं. तुम्ही कितीही ज्ञानी असलात तरीही अनुभवाशिवाय कुठेतरी आयुष्यात कमी पडाल, पण ज्ञानाला जर अनुभवाची जोड असेल तर आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ शकाल. अनुभवातून आयुष्याचा खरा अर्थ कळतो अनुभवातून माणसं ही ओळखता येतात, अनुभव एक असं शस्त्र आहे ज्याच्या घावाने दुसऱ्याच्या मनावरील घाव ही कळतात. अनुभव जितके वाढतील ना तितकंच आयुष्याचं कोडं ही सुटत जाईल, या अनुभवासारख्या शस्त्रामुळे  अडचणींचा विळखा ही हळूहळू तुटत जाईल.                               -अंकिता घुगे.